*अध्याय -२*
*मेळघाटच्या कथा - ६*
*घर थकलेले संन्याशी*
बंदरकहु, चडूपाटीच्या रमणीय मचानावर रात्रभर मुक्काम करुन दिवसभर रानात भंटोलपणा केला की देहभावातली उर्जा रसरसून वर येते. रानासोबत, झाडझडोऱ्यासोबत, चिड़िभोरिसोबत, हुदकणाऱ्या वाऱ्यासोबत जीव एकाकार झाला की, भौतीकाची बंधन तुटतात. हळुवार मनात पाझरणाऱ्या आत्मानंदानं चराचराचा विसर पडतो. अंगाखांद्यावर चैतन्याचा दरवळ भीरभीरतो. पानाफुलांना रानात वाहणाऱ्या सरितेचा, वाऱ्याचा भक्कम आधार असतो. ओथंबुन उठणाऱ्या रानपावीत्र्यावर एखादा वेळी वीजपाऊस, वादळ वा वणव्याचं संकट कोसळतं तसच मानवी जीवनातही होतं. सरितेप्रमाणे शांत शुभ्रस्फटिक आयुष्यावर औदासीन्याचे ओरखडे उठतात, संकट येतात. हतबल झालेला माणूस मग देवाधर्माचा, योगविधिचा आसरा शोधतो. पण वैराग्यमूर्तीला. स्थितप्रज्ञाला दुख आणि संकट शिवत नाहीत, कारण तो पार सुखदुःखाच्या पल्याड गेलेला असतो. त्याच्या भावसमाधीतून त्याला कुणीही बाहेर खेचू शकत नाही. कुठंलही संकट त्याला नमवू शकत नाही.
निसर्गाची साथसोबत कायम असली की, माणूस एका वेगळ्याच आनंदाच्या आणि वैराग्याच्या पायरीवर आनंदधन होऊन तरळत असतो. या सुखदुःखाला आणि एकंदरीतच त्याच्या असण्याला तो नुसता साक्षी असतो. हा साक्षीभाव आणि हे आनंदतरंग जेव्हा जगण्याच्या पुढ्यात स्वर्गीय अनुभव देतात, तेव्हा तुमच्या घरादाराला इस्टेटीला अर्थच उरत नाही.
मेळघाटातील माझी घरं म्हणजे सन्यस्त प्रीतीचं माहेर जणू. ही घरं इतस्ततं विखुरलेली आहेत. हमरस्त्यावर दाठ्ठयात उभं राहून माहेरच्या दमणीची वाट पाहणाऱ्या सासुरवाशीणीसारखी. ही घरं थकलेली नाहीत आणि पण येथे येऊन राहणाऱ्या पांथस्थाला संन्यसत्व येतं. मनाची ही अवस्था हा पांथस्थ आयुष्यभर जोपासू शकतो.
आडवळणाच्या बेलकुंडला असचं एक अनवट रेस्टहाऊस नावाचं घरं आहे आणि त्याच्याभोवती फिरणारं भुताटकीच्या गोष्टीचं वलय देखिल आहे. या रेस्टहाऊसच्या अंगणातला चाफा बारोमास फुललेला असतो. आजुबाजूला मैलोनमैल गाव आणि विजेचा पत्ता नाही. चौफेर डोंगररांगा आणि शेजारच्या घळईतून वाहणारी गडगा नदी, या दगडी घराला वैभवाचा साज देवून सदैव सज्ज आहे. १८९१ साली इंग्रजानी बांधलेल्या या रेस्टहाऊसमध्ये रात्री कंदिल पेटवून रात्रभर मुक्काम करायची माझी इच्छा अपूर्णचं राहणार आहे. जंगलाची सुरक्षा आणि वनव्यवस्थापनाच्या सचोटित हे रेस्टहाऊस बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे. बेलकुंडवरून उत्तरेकडे हरीसालला जायला निघालो कि आढाव, चिखली, तारुबांदा ही गावं लागतात, तारुबांदा गाव ओलांडून पूर्वेकडे कांद्रीबाबा देवस्थानाकड़े रानवाटेनं निघालो कि मध्ये देखनं तारुबांदा रेस्टहाऊस लागतं. गुगामल व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या रेस्टहाऊसमध्ये मुक्काम करणे म्हणजे ‘उदंड पाहिले, उदंड देखीले’ असेच म्हणावे लागेल. एकांतवासातून उमळणारी मनाची नवी कोरी अवस्था इथे सहजसाध्य होते.
कोलकास, धारगड, कोकटू, खटकाली, चुनखडीच्या रेस्टहाऊसांना अपार शांतता आणि लोभस निसर्ग सौदर्याचे वरदान आहे, कोलकास रेस्टहाऊसच्या दक्षिणेकडील अंगणात पावसाळ्यात उभं राहून सुसाट करीत वाहणारी सीपना नदी पाहिली की, डोळ्याचे पारणे फिटते. या भागात रानगवा, वाघ, चितळ, सांभर, बिबट, अस्वल आणि इतर अनेक प्राण्यांचे साम्राज्य आहे. धारगडच्या रेस्टहाऊसचं बांधकाम १९६२ मध्ये केल्याची सरकारदरबारी नोंद आहे. गुल्लरघाटसारखी गावं विस्थापीत झाल्यानं या भागातील प्राण्यांची संख्या वाढली आहे. कोकटूचं अतीसंरक्षीत क्षेत्रातील विश्रामगृह १८९४ मध्ये बांधण्यात आलेलं आहे. १८९० च्या आसपास या भागात इंग्रजांचं आगमन झालं. प्रचंड वनसंपदा आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागात दुर्मिळ वनस्पती आणि रहस्यमयता ठाण मांडून आहे.
चुनखडी, रायपुर, हतरू, चौराकुंड, रंगुबेली, घटांग, सेमाडोह, माखला आणि जारीद्याच्या रेस्टहाऊसेसची एक खासीयत आहे. या गावांमध्ये मुक्कामी थांबलो की रात्री उशीरापर्यंत आदिम गाणी किंवा नृत्यविष्कारांची सुरावट अलवारपणे निज होऊन डोळ्यावर उतरते.
ॠतु कोणताही असो मेळघाटची रात्र बारोमास डोळ्यावर स्वप्न लेवूनच उतरते. पावसाळ्यात गवातापानांतून टपटपणारे पाऊसथेंब निंदीवर येतात तेव्हा नद्यानाल्यांचा खळखळाट गच्च रानाच्या मौनप्रभेवर रात्ररात्र तरंग उठवत निनादतो. एकदा दिवसभर रानात हुंदडून झाल्यावर हतरूवरून रात्री उशीरा जारीद्याला जायला निघालो. काळोखाच्या कुशीत विरलेली रात्र होती. बाईकच्या मीणमीणत्या उजेडात जारीद्याची वाट चुकून राजाडोह कँपच्य वाटेला कधी लागलो कळलच नाही. दहाएक कोसावर आंबेडाच्या थंडाव्यात आपल्या गाईगुरांचं कोंडाळं आणि मध्ये शेकोटी करुन झोपलेला गवळी दिसला. त्यानं आपल्या खुबीडीतल्या पाण्याच्या सपका माझ्या डोळ्यावर मारला तसा मी भानावर आलो. त्याचासोबत गवताच्या भाऱ्यावर निजतांना मी बेलकुंड विश्रामगृहाच्या परसातलं चाफ्याचं फुल झालो.
*-प्रा. डॉ. एकनाथ तट्टे*
9404337944
0 Comments